सुंदर कथा

 सुंदर कथा



एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही. शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला. हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला,

एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला. तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली. 

पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली. वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ? 


तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय." 


माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता. रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला,   "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."  पण अस्वलानं तसं केलं नाही. 

थोड्या वेळानं माणसाला जाग आली. मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली. तो माणसाला म्हणाला,  "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल." 


माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला. सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही. 

पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला. ते म्हणालं, 

"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला  फसवलंस. "पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं." 


बोध - पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून  अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे.  

     ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.

      सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त ्या सुटणार्या असतात,याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण  आयुष्यभर संपत नाही... 

🙏🙏🙏🙏